जिल्ह्यात आता ‘हर घर दस्तक’ मोहीम

0

रत्नागिरी : कोरोनाप्रतिबंधक लसीकरणासाठी प्रत्येकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. जे लसीकरणासाठी तयार नसतील त्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे आणि जिल्हयाचे लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी गुरुवारी दिले. जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात लसीकरणांसंदर्भातील ‘हर घर दस्तक’ अभियानाच्या जिल्हा कृती दलाच्या बैठकीत ते बोलत होते. हर घर दस्तक अभियान गेल्या ३ नोव्हेंबरपासून सुरू झाले असून ते येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्यानिमित्ताने झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, लसीकरणासंदर्भातील गावनिहाय यादी मागवून घ्यावी. ज्या ठिकाणी लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, त्या गावांवर, ठिकाणांवर लसीकरणासाठी भर द्यावा. पहिल्या डोसचे प्रमाण चांगले असून जे राहिलेले आहेत त्यांचे लसीकरण पूर्ण करून घ्यावे. दुसऱ्या डोससाठी आवश्यक डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे त्यानुसार शिबिरे लावून दुसऱ्या डोसच्या लसीकरणावर भर देऊन तेही पूर्ण करावे. या सर्व गोष्टींमध्ये ग्रामकृती दल, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांची आवश्यक ती मदत घ्यावी, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी लसीकरणांसदर्भात आतापर्यंत करण्यात आलेल्या कामाची आणि या मोहिमेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली.

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाची जिल्हास्तरीय बैठकही गुरुवारी झाली. टीबी हारेगा देश जितेगा हे घोषवाक्य घेऊन ही मोहीम १५ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात राबविण्यात येणार आहे. बैठकीला प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी घाणेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले आदी अधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:11 AM 12-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here