रत्नागिरी : प्रतिपंढरपूर म्हणून गणल्या गेलेल्या येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दि. १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दोन वर्षानंतर कार्तिकी महोत्सव जल्लोषात, परंतु कोव्हिडच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात येणार आहे. सोमवारी मध्यरात्री प्रथेप्रमाणे विठुरायाचा रथोत्सवही साजरा होणार आहे. एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिर सजले आहे. एकादशीनिमित्त पहाटे २ वाजता श्रीवर पवमानयुक्त मंगलाभिषेक आणि श्रींची समृद्ध महापूजा करण्यात येणार आहे. या पूजेचा मान सविता कुलापकर यांना मिळाला असून पहाटे ४.३० वाजता काकडा आरतीला प्रारंभ होऊन संपूर्ण दिवस सुश्राव्य भजनांचे कार्यक्रम आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता कै. दाजिबा नाचणकर संस्थापित दिंडी भार्गवराम मंदिरापासून निघून विठ्ठल मंदिरात येणार आहे. मध्यरात्री १२ वाजता विठुरायाच्या रथोत्सवाला प्रारंभ होईल. मंगळवारी पहाटे ५ वाजता खालची आळीतील श्री देव तृणबिंदकेश्वराची भेट होऊन कोव्हिड नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री विठ्ठल मंदिर संस्थेतर्फे देण्यात आली. गेल्या वर्षी आषाढी, कार्तिकी एकादशी कोरोना लॉकडाऊनमुळे फक्त मंदिर संस्थेपुरतीच साजरी करण्यात आली. भाविकांना प्रवेश दिला गेला नव्हता. मात्र, यंदा कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे आषाढीला भाविकांना दर्शनाची संधी मिळाली. तर उद्या कार्तिकीनिमित्त भाविकांना भजन, रथोत्सव, दर्शनाची पर्वणी मिळणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 15-Nov-21