रत्नागिरी: शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य,अभियांत्रिकी कौशल्य आणि रयतेच्या हिताच्या विविध योजनांची माहिती शासनाने अभ्यासक्रमाच्या स्वरूपात विद्यार्थ्यांना दिली, तर आजचे विद्यार्थी उद्याचे उत्तम नागरिक बनतील, असे मत गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले. गाव विकास समितीमार्फत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप करून शिवजयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. संघटनेतर्फे संगमेश्वर तालुक्यातील विविध ठिकाणी गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या उपलब्ध करून देण्यात आल्या. शिवजयंती निमित्ताने करंबेळे व मोर्डे शाळेत वह्यावाटप करण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजिच करण्यात आला होता. यावेळी गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड, महिला संघटना अध्यक्ष दीक्षा खंडागळे-गीते, उपाध्यक्षा अनघा कांगणे, देवरूख शहर अध्यक्ष डॉ. मंगेश कांगणे तसेच ग्रामस्थ ढवळ, चव्हाण, मोर्डे शाळेचे शिक्षक श्री. कानार आदी शिक्षक उपस्थित होते. सुहास खंडागळे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया, युद्धनीती मुलांना शिकवतानाच महाराजांच्या विविध कौशल्यांची माहिती देणारे धडे शासनाने शालेय अभ्यासक्रमात विस्तृतपणे द्यायला हवेत, अशी अपेक्षा श्री. खंडागळे यांनी व्यक्त केली.गाव विकास समितीमार्फत दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवून शिवजयंती साजरी केली जात असल्याबद्दल शिक्षकांनी कौतुक केले.