नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मोठे यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीनही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर विरोधक आणि शेतकरी आंदोलकांसह अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणाही साधला आहे. मात्र, आता भाजप नेत्यांच्याही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा शेतकऱ्यांबाबत असलेली त्यांची संवेदनशीलता वचनबद्धता दर्शवते, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित करत केंद्रीय कृषी कायदे रद्द करत असल्याची घोषणा केली. यानंतर आंदोलक शेतकऱ्यांनी मिठाई वाटत जोरदार जल्लोष केला. परंतु, शेतकरी आंदोलन यापुढेही सुरूच राहील. लगेच ते मागे घेता येणार नाही, अशी भूमिका राकेश टिकैत यांनी मांडली. तर विरोधकांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला हा निर्णय आहे, अशी टीका केली. यानंतर भाजप नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. नितीन गडकरी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मत व्यक्त करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली घोषणा देशाचे अन्नदाते, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी त्यांची असलेली संवेदनशीलता आणि वचनबद्धता दर्शवते. गुरू नानक देवजींच्या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने हे पाऊल सर्वांना सोबत घेऊन देशाला पुढे नेण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प अधोरेखित करते, असे ट्विट नितीन गडकरी यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:07 PM 19-Nov-21