दिल्लीच्या प्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांना सल्ला मागितला आहे. गडकरींकडे नवनवीन आयडिया असतात. त्यामुळे त्यांनी न्यायालयात येऊन प्रदुषण रोखण्यासाठी उपाय द्यावा, असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सांगितलं आहे. शेतीतील कचरा जाळल्याने आणि फटाके फोडल्याने प्रदुषण होत आहे. रस्त्यावर धावणाऱ्या गाड्याही मोठ्या प्रमाणात प्रदुषण करतात. त्यामुळे परिवहनमंत्री गडकरी यांनी न्यायालयात येऊन सल्ला द्यावा, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. न्यायालयात आज दिल्लीच्या प्रदुषणावर सुनावणी झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना न्यायालयात येण्यासाठी आदेश देऊ शकत नाही. पण प्रदूषण रोखण्याबाबत असलेल्या नवीन आयडिया त्यांनी येथे येऊन सांगाव्यात, असंही शरद बोबडे म्हणाले आहेत. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व सार्वजनिक परिवहन उपक्रम आणि सरकारी पेट्रोल, डिझेल वाहनांच्या जागी इलेक्ट्रिक वाहनं आणली गेली पाहिजेत, अशी मत सर्वोच्च न्यायालयानं मांडलं आहे.