अभ्यासासोबतच, खेळ, व्यायाम, यांसारखे विविध उपक्रमांची एक शृंखला म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धती अशी ओळख असलेल्या आपल्या रत्नागिरीमधील रा.भा.शिर्के प्रशालेच्या एड. बाबासाहेब नानल गुरुकुलने महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर ( 1649 मी ) तिसऱ्यांदा सर केले. मुलांमध्ये साहसी गुण यावेत यासाठी सायकल सहल, ट्रेकिंग, रिव्हर क्रॉसींग, रॅपलींग असे उपक्रम गुरुकुल प्रकल्पामध्ये सातत्याने राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून या वर्षी अहमदनगर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कळसुबाई सर करण्याचे नियोजन केले गेले व ते यशस्वी पूर्ण झाले. अकोले तालुक्यातील बारी गावातून शिखरापर्यंतचे अंतर मुलांनी दोन तासामध्ये चढून पूर्ण केले. या ट्रेक मध्ये गुरुकुल ची आठवी व नववी मधील एकूण 35 मुले सहभागी झाली होती. छातीत धड़क भरेल अशी ऊंची, लोखंडी शिड्यांवरुन चढण्याचा अनुभव, छान थंडी धुक्यामध्ये हरवून गेलेले कळसूबाई शिखर. निसर्गाच्या सानिध्यातील हा ट्रेक विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरला. प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. गुळवणी मैडम आणि गुरुकुल प्रकल्प प्रमुख श्री. किरण सनगरे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. गौरव पिळणकर, श्री. पंकज जोशी व श्रीम. सायली देशपांडे यांनी हा ट्रेक यशस्वी केला. संस्थेचे कार्यवाह श्री. सतीश शेवड़े आणि कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
