रत्नागिरी : मागील पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना काही ठिकाणी रिक्षा चालकांनी पाठिंबा दिला असताना रत्नागिरीत मात्र उलटेच चित्र पाहायला मिळत आहे. एसटी बंद असल्याचा फायदा उचलत रिक्षा चालकांनी आपले प्रवासी भाडे दामदुप्पट वाढवत प्रवाशांना लुटण्याचा धंदाच सुरू केला आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उभ्या रिक्षा चालकांकडून मुजोर व्यवसाय सुरू असून याविरोधात आरटीओ प्रशासनाने लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी होत आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पंधरा दिवसांपेक्षा अधिक काळ संप सुरू असून एसटी वाहतूक ठप्प आहे. या संपाचा खासगी वाहतूक चालकांनी फायदा उचलण्यास सुरुवात केली असून गोरगरीब प्रवाशांची पिळवणूक करण्यास सुरुवात केली आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकावर याचा सर्वाधिक अनुभव येत आहे. एसटी बंद असल्याचा फायदा उठवत रेल्वे स्थानक येथील रिक्षाचालकांनी भाडे दुप्पट केले आहे. नजीकच्या ठिकाणचे भाडे तर सर्रास नाकारले जात आहे. लांबच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांना प्रवासाकरिता अन्य पर्यायच उपलब्ध नसल्याने येथील रिक्षा चालकांकडून प्रवाशांची प्रचंड लूट सुरू आहे. रेल्वेच्या तिकिटापेक्षाही रेल्वे स्थानकावरून घर गाठण्यासाठी प्रवाशांना प्रचंड खर्च करावा लागत आहे. रिक्षा चालकांकडून सुरू असलेल्या या मनमानी भाडेवाढीवर आरटीओ प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:53 PM 24-Nov-21