रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हयातील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गट तयार करून शेती करावी आणि भरघोस पीक घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले. कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्याने जिल्हास्तरीय आंबा निर्यात कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे, कृषि पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राचे कृषिविद्यावेत्ता डॉ. वैभव शिंदे आदी मान्यवर तसेच आंबा बागायतदार, शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन, गट तयार करून अथवा सहकार पद्धतीने शेती केली, पीक घेतले तर उत्पादन वाढेल. पिकांमधील गुणवत्ता वाढेल आणि फळपिके निर्यातीमध्येही वाढ होईल. यामुळे उत्पादनासाठी येणारा खर्चही कमी होईल. पीक घेताना जैविक स्रोत वापरावेत, जैविक पीक, शेती उत्तम गुणवत्तेची असते. आरोग्याच्या दृष्टीने जैविक शेतीवर भर द्यावा. जिल्ह्यामध्ये आंबा, काजूचे उत्पादन मोठया प्रमाणावर घेतले जाते. त्यांची निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने काम करावे. प्रास्तविकामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे म्हणाल्या, जिल्ह्यामध्ये आंबा, काजू फळपीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. आंबा उत्पादनामध्ये जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. येथे निर्यातीसाठी मोठी संधी आणि वाव आहे. याची जाणीव आणि जागृती करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत आंबा निर्यात कार्यपद्धती, आंबापिकावरील कीड-रोग नियंत्रणासंबधी उपाययोजना, भौगोलिक मानांकन (जीआय) आदी विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:53 PM 26-Nov-21