कोकणातील विकासकामांचा आढावा घेण्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा दौरा केला. या दौऱ्यात कोकणातील शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मात्र, चर्चेचा विषय ठरले ते गुहागरचे आमदार भास्कर जाधव. रत्नागिरीच्या प्रत्येक कार्यक्रमात भास्कर जाधव मुख्यमंत्र्यांपासून अंतर राखून होते. त्याचबरोबर भर कार्यक्रमात त्यांनी खासदार विनायक राऊत यांचा हातही झटकला होता. गुहागरचे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजी गंभीर दखल मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. जाधवांच्या नाराजीनाट्यानंतर उद्धव यांनी स्वत: त्यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती मिळते आहे. तसंच, जाधव नेमके कोणत्या कारणामुळं नाराज आहेत याची माहिती घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी खासदार विनायक राऊत यांना दिले आहेत. इतकंच नव्हे तर एका कार्यक्रमात त्यांना जवळ बोलावणाऱ्या खासदार राऊत यांचा हातही त्यांनी झटकला. त्यांच्या या रुसव्याचे व्हि़डिओ राज्यभर व्हायरल झाले होते. अधिकृत सरकारी दौरा असल्यानं मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं. मात्र, काहीतरी खटकल्याचं उद्धव ठाकरे यांनी ताडलं होतं. त्यामुळंच दौरा संपल्यानंतर आता त्यांनी जाधव यांच्याशी चर्चा केल्याचं समजतं. मूळचे शिवसैनिक असलेले भास्कर जाधव मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी नगरविकास राज्यमंत्रिपदही भूषवलं होतं. २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ते स्वगृही परतले व आमदारही झाले. शिवसेनेत परतताना त्यांना मंत्रिपदाचा शब्द दिल्याचं सांगितलं जात होतं.महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला एकही आमदार गमावणे परवडणारे नाही. त्यामुळंच मुख्यमंत्री प्रत्येक बाबतीत सबुरीनं घेत असल्याचं बोललं जातं आहे.आता यावर काय निर्णय होतो ते काळचं सांगेल.
