राजापूर एसटी आगारातील 22 कर्मचारी संप सोडून कामावर रुजू

0

राजापूर : एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीन करण्यासह अन्य विविध मागण्यांसाठी गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या कर्मचार्यांच्या बेमुदत संपामध्ये आता काहीशी फूट पडू लागल्याचे चित्र आहे. येथील राजापूर आगारातील तांत्रिक कार्यशाळेतील अठरा आणि चार चालक-वाहक असे बावीस कर्मचारी आज एकाच दिवशी कामावर रुजू झाले आहेत. एसटी महामंडळ राज्य शासनामध्ये विलीन करणे, पगारवाढ यांसह अन्य विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या वीस दिवसांपासून चालू आहे. या संपामध्ये राजापूर आगारातील २०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामध्ये कायम आणि रोजंदारी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आगाराबाहेर तंबू ठोकून हे कर्मचारी दिवसभर निदर्शन करत आहेत. संप मिटविण्यासाठी प्रशासनाकडूनही आक्रमक पवित्रा घेण्यात आला होता. त्यामघ्ये राजापूर आगारातील ९ कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले असून १५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तरीही कर्मचार्यांचा संप सुरूच आहे. शासनाकडून पगार वाढीचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता राज्यातील काही आगारातील कर्मचारी कामावर रुजू होऊ लागले आहेत. त्यामध्ये राजापूरचा समावेश आहे. राजापूर आगारातील २२ कर्मचारी आज कामावर रुजू झाले. त्यामध्ये तांत्रिक कार्यशाळेतील अठरा, तीन चालक आणि एका वाहकाचा समावेश आहे. या सर्व कर्मचार्यांना तात्काळ रुजू करून घेण्यात आल्याची माहिती आगार प्रमुख राजेश पथरे यांनी दिली. आजअखेर आगारातील कामावर रुजू झालेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ४१ झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्मचारी रुजू झाल्याने आज राजापूरमधून ११ एसटी बस सोडण्यात आल्या. त्यामध्ये राजापूर-हातदे, पाचल-आंबा, बुरंबेवाडी, नाटे, तारळ, राजापूर-जांभवली या मार्गावर फेऱ्या सोडण्यात आल्याची माहिती आगार व्यवस्थापक राजेश पाथरे यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
8:34 PM 27-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here