रत्नागिरी : शहरात पहाटेच्या वेळी बोचकी घेऊन भंगार गोळा करणाऱ्या महिलांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. या महिला अनेक ठिकाणी खाजगी कंपाउंड मध्ये प्रवेश करून पत्रा, लोखंडी सामान चोरत असल्याच्या तक्रारी अनेक नागरिक करू लागले आहेत. शहरातील धनजी नाका येथे राहणारे लियाकत हसन हकीम यांनी देखील शहर पोलीस स्थानकात आपले ९ हजाराचे समान चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. लियाकत हकीम यांच्या घराच्या वरील खोलीत घरगुती भांडी व इतर सामान होते. २८ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांना काहीतरी आवाज आल्याने जाग आली. त्यांनी दरवाजा उघडून पहिले असता दोन महिला हातात बोचकी घेऊन उभ्या होत्या. सदर ठिकाणी जाऊन त्या महिलांना विचारणा करून त्यांची बोचकी तपासली असता हकीम यांना त्यांच्या घरातील सामान आढळले. याचदरम्यान ७० वर्षीय हकीम यांना सदर महिलांना ढकलून दिले व बोचकी घेऊन पळाल्या. याबाबत हकीम यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. दिवसेंदिवस अशा पद्धतीने चोरीचे प्रकार वाढत जात असून आता लोकांचे किंमती सामान देखील चोरीला जात असल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी पहाटेच्या वेळी शहरात फिरणाऱ्या या महिलांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.