रत्नागिरी : रत्नागिरी शहरात होत असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण होत असून, रस्त्यांचा दर्जा चांगला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नवीन रस्ते तयार करून महिनाही होत नाही तोच यावर पुन्हा खड्डे पडत आहेत. त्यामुळे या कामाचा दर्जा तपासा, अशी मागणी भाजपा शहर चिटणीस नीलेश आखाडे यांनी केली आहे. रत्नागिरी शहर मारुती मंदिर सर्कल परिसरात अशाच नवीन रस्त्यांवर खड्डे पडू लागले आहे; यामुळे होत असलेली रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाची तर होत नाहीत ना? असे वाटू लागले आहे. रस्त्यावर टाकण्यात आलेले खडी, डांबर निघत असून, त्यावर खड्डे पडत आहेत. यामुळे प्रतिवर्षी पावसात रत्नागिरी शहरवासियांना प्रचंड त्रास होतो. दरवर्षी हे खड्डे भरण्यासाठी लाखो रुपये खर्चही केले जातात. त्यामुळे जनतेचा कररूपी पैसा वाया जात आहे. त्यामुळेच रस्त्यांची होत असलेली कामे ही उत्कृष्ट दर्जाची होणे आवश्यक आहे. रस्त्यांच्या कामाचे ऑडिट करून या रस्त्यांचा दर्जा तपासावा. जनतेला चांगल्या दर्जाचे रस्ते मिळावेत, अशी मागणी आखाडे यांनी जिल्हाधिकारी पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:28 PM 07-Dec-21