रत्नागिरी : सदोष सेवा दिल्याबाबत ३० दिवसांत ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश सोमवारी ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बांधकाम व्यावसायिकाला दिले. वैशाली कन्स्ट्रक्शनचे रमेश राजाराम साळवी असे नुकसान भरपाईचे आदेश देण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. त्यांच्याविरोधात शंकर पांडू नाईक (रा. मुरुगवाडा, रत्नागिरी) यांनी ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार सन २०१५ मध्ये रमेश साळवी याच्याकडे नाईक यांनी सदनिका घेण्याबाबत साठेखत रजिस्टर केले होते. मात्र, बांधकाम व्यावसायिकाने बांधखिंडी, शिरगाव रोड येथील शिवसृष्टी कॉम्प्लेक्स इमारतीचे बांधकाम ठरलेल्या मुदतीत पूर्ण केले नाही. त्यामुळे शंकर नाईक यांनी रत्नागिरी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीबाबत सुनावणी घेण्यात येऊन रमेश साळवी याने शंकर नाईक यांना सदोष सेवा दिली असे निकालपत्रामध्ये घोषित केले. तसेच नुकसान भरपाईचा आदेश दिल्यापासून ३० दिवसांच्या आत नाईक यांना सदनिकेचे खरेदीखत करुन देण्याचे आदेश देण्यात आले. त्याची पूर्तता न केल्यास नाईक यांच्याकडून स्विकारलेली ११ लाख ५० हजार रुपये रक्कम द. सा. द. शे. १५ टक्के दराने व्याजसह देण्याचे आदेश रमेश साळवीला दिले. या प्रकरणात शंकर नाईक यांना शारिरीक व मानसिक त्रास झाल्यामुळे २० हजार रुपये आणि तक्रार अर्जाच्या खर्चासाठी १० हजार रुपये असे ३० हजार रुपये देण्याचे आदेश ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार जाधव आणि सदस्य श्रीकांत कुंभार यांनी दिले तर तक्रारदार शंकर नाईक यांच्यवतीने अॅड. मनीषा नलावडे यांनी काम पाहिले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:35 AM 08-Dec-21