राजापूर : गेले चार पाच दिवसांपासून तालुक्यात संततधार पडणाऱ्या पावसाने विश्रांती घेतली असून बुधवारी सकाळपासून ऊन पडल्याने पुरामुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आले आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून राजापूर शहर व तालुका परिसरात संततधार पर्जन्यवृष्टी होत होती. त्यामुळे अर्जुना व कोदवली या दोन्ही नदयांना पूर आला होता. तर पुराचे पाणी शहरातील जवाहरचौकात शिरले होते. पुराच्या पाण्यामुळे वरचीपेठ रस्ता तसेच शहराच्या इतर भागाचा शहराशी असलेला संपर्क तुटला होता. मात्र बुधवार पासून पावसाने उघडीप दिल्याने दोन्ही नद्यांना आलेला पूर ओसरला आहे. तर शाळा महाविद्यालयेही पूर्ववत सुरू झाली असून बाजारपेठेतील व्यवहारही पूर्ववत सुरू झाले आहेत. तर वरचीपेठ चिंचबांध मार्गावरील पाणी ओसरल्याने या मार्गावरची वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे. त्याचबरोबर शीळ गोठणे दोनिवडे मार्गावरील पुराचे पाणी ओसरले असून हा मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे.
