मुंबई : सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहांमध्ये जे विद्यार्थी सन 2020-21 मध्ये प्रथम वर्षात शिकत होते ते आता दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असतील तरी त्यांनी वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केल्यास त्यांचा गुणवत्ता यादीत समावेश करून गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात यावा, असे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. प्रवेश नियमावली नुसार शैक्षणिक सत्राच्या पहिल्या वर्षात प्रवेशीत विद्यार्थी पात्र असतो. मागील काळात कोविड विषयक निर्बंधांमुळे शाळा-महाविद्यालये बंद होती व ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते. त्यामुळे याकाळात सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे बंद होती. दरम्यान आता शाळा – महाविद्यालये सुरू झाल्यानंतर ऑनलाईन काळात प्रथम वर्षाचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षासाठी वसतिगृह प्रवेश मिळण्यास मध्यंतरीच्या अटीमुळे बाधा येत होती. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांना आता द्वितीय वर्षात गुणवत्तेनुसार वसतिगृहात थेट प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:20 PM 10-Dec-21