‘…तर चिपळूण पुन्हा एकदा पाण्याखाली जाईल’; आ. प्रसाद लाड यांनी व्यक्त केली भीती

0

मुंबई : चिपळूण शहर डोंगराच्या मध्यभागी आहे. येथे प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे तेथे पूर येऊन जनजीवन विस्कळीत होते. या नद्यांचा 70 हजार क्युबिक मीटर गाळ काढावा लागेल, असे शासकीय सर्वेक्षणातून निष्पन्न झाले आहे.

परंतु तेथील कंपन्यांनी वगैरे सर्वेक्षण केले असता 3 लाख 76 हजार कोटी घनमीटर गाळ काढावा लागेल. आता सुरुवात केली तर दोन वर्षे तरी गाळ काढण्यासाठी लागतील. आता 70 हजार कोटी घनमीटर गाळ काढण्याची निविदा काढण्यात आली आहे. त्यासाठी 9 कोटी 70 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गाळ काढण्यासाठी एकूण 350 कोटी रुपयांचा खर्च आहे. हा खर्च तात्काळ मंजूर करायला हवा. हा गाळ काढण्यात आला नाही, तर चिपळूण पुन्हा एकदा पाण्याखाली जाईल, अशी भीती आमदार प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगड जिल्ह्यात महाड शहरात जवळपास 3,400 व्यापारी असून महापुरामुळे त्यांचे अतोनात नुकसान झाल्याचे लक्षवेधीद्वारे निदर्शनास आणले. त्याचवेळी प्रसाद लाड यांनी चिपळूण शहरातून वाशिष्ठी नदी आणि एकूणच कोकणातील नद्यांचा गाळ काढण्याची आणि त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.

यावर उत्तर देताना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, कोकणातील नद्या उथळ झाल्याने तेथे पूर परिस्थिती उद्भवून जनजीवन विस्कळीत होते. मागील दोन वर्षांप्रमाणे चिपळूण पुन्हा पाण्याखाली जाऊन जनजीवन विस्कळीत होऊ शकते. मात्र ही परिस्थिती पुन्हा ओढवू नये, यासाठी नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारा गाळ काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी अधिकचा निधी मिळवून देण्यासाठी तातडीने पाठपुरावा करण्यात येईल.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:23 PM 24-Dec-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here