मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाचा पाचवा आणि शेवटचा दिवस अत्यंत वादळी ठरला. विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सूचनेकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं.
संपूर्ण अधिवेशनाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृत्ती अस्वास्थामुळे विधीमंडळामध्ये येऊ शकले नाहीत. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वाखाली अधिवेशनाचं कामकाज अत्यंत चांगलं झालं, या काळात अनेक विषयांना न्याय मिळाला. म्हणून अधिवेशनाच्या काळात अजित पवारांकडे नेतृत्व द्यावं आणि इतर वेळी उद्धव ठाकरेंनी नेतृत्व करावं अशी सूचना मुनगंटीवारांनी राज्याचे मंत्री आदित्य ठाकरेंना केली. आता ही सूचना म्हणजे अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका होती अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “या वेळचं अधिवेशन पाचच दिवस झालं. पण या काळात अजितदादांच्या नेतृत्वाखाली अतिशय उत्तम काम झालं. मी आदित्य ठाकरेंना सूचना करतो की अधिवेशन काळात सरकारचं नेतृत्व अजितदादांकडे द्या, इतर वेळी नेतृत्व बाबांकडे (उद्धव ठाकरे) द्या. कारण हे कामकाज तरी होऊ शकलं. अनेक विषय मार्गी लागले. अनेक विषयांना न्याय मिळाला.”
आता सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरुन एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जातंय. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यशैलीचं कौतुक करत त्यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. तर दुसरीकडे अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर शंका व्यक्त केली.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 28-Dec-21