व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने मित्र-मैत्रिणी आपल्या मनातील प्रेमभावना गुलाबाचं फूल देऊन व्यक्त करतात. परंतु अमरावतीच्या शाळेतील विद्यार्थिनींना वेगळीच शपथ देण्यात आली होती. प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा निश्चय विद्यार्थिनींनी केला होता. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठा गदारोळ झाला. अखेर विद्यार्थिनींना अशी शपथ देणाऱ्या तीन प्राध्यापकांचे निलंबन करण्यात आले आहे. तरुण वयातील मुलामुलींच्या प्रेम-प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. हुंडा घेण्याची पद्धतही वाढीला लागली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अनोखा निर्धार केला. ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने या विद्यार्थिनींना प्रेमविवाह आणि हुंडा घेऊन लग्न न करण्याची शपथ देण्यात आली होती.
नेमकं काय म्हणाल्या होत्या विद्यार्थिनी?
‘मी अशी शपथ घेते की, माझा माझ्या आई वडिलांवर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे समोर घडणाऱ्या घटना लक्षात घेता, मी प्रेम व प्रेमविवाह करणार नाही. त्याशिवाय मी माझे लग्न हुंडा घेणाऱ्या मुलाशी करणार नाही. समजा सामाजिक परिस्थितीमुळे आज माझे लग्न माझ्या कुटुंबाने हुंडा देऊन केले, तर भावी पिढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकडून हुंडा घेणार नाही. तसेच मुलीसाठी हुंडा देणार नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून मी शपथ घेते.’