सिंधुदुर्ग : येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी गोरगरीब लोकांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव घेता त्यांच्यावर टीका केली. जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी बोलताना नारायण राणे पुढे म्हणाले, अक्कल सांगण्यासाठी आलेल्यांना आम्ही अकलेचे तारे दाखवून दिले, असा टोला त्यांनी महाविकास आघाडीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान गद्दारीचा वारसा असलेल्या लोकांच्या ताब्यात असताना बँकेची बदनामी झाली. मात्र आता नव्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या ताब्यात बँक सुरक्षित राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी राणे पुढे म्हणाले, आपला व बँकेचा कोणताही संबंध नाही. आपण जे कर्ज काढले आहेत त्याच्या व्याजापोटी वर्षाला सात ते आठ कोटी रुपये बँकेत भरतो. आतापर्यंत फक्त दोन ते तीन वेळा मी बँकेत आलो आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बँकेचे मावळते अध्यक्ष सतीश सावंत यांचे नाव न घेता टीका केली. त्यांचा वारसा गद्दारीचा आहे, अशा लोकांना आपण पळवून लावले आहे. त्यामुळे आता लपूनछपून फिरण्याची परिस्थिती त्यांच्यावर आली आहे. तो एक अपशकून होता, असे सांगत त्यांनी येणाऱ्या काळात जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी गोरगरीब लोकांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:11 PM 13-Jan-22