मुंबई : राज्यातील सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमविरोधात २१ ऑगस्टला मोर्चा काढण्याची घोषणा केली. आगामी विधानसभा बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत अशी मागणी विरोधी पक्षातील सर्वच नेत्यांनी केली. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम नको बॅलेट पेपर आणा अशी मागणी विरोधकांनी एकमुखाने केली. आज (ता.२) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांना ईडीच्या चौकशीबाबत विचारण्यात आले. याबाबत त्यांनी मला तुमच्याकडूनच ही माहिती आली असल्याचे सांगितले. माझ्यापर्यंत ईडीकडून अशी कोणतीही माहिती पोहोचली नसल्याचा खुलासा त्यांनी केला. त्याचबरोबर राज यांनी अश्याच पद्धतीने माध्यमानांही धमकवण्यात येत असल्याचा टोला लगावला. त्यामुळे अनेकांनी लिखाण थांबवल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात देशव्यापी वातावरण निर्मितीसाठी कंबर कसली आहे. त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन निमंत्रण दिले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधात राज यांनी रान उठवले होते, पण त्यांच्या पक्षाचे उमेदवारच नसल्याने त्याचा फारसा परिणाम होऊ शकला नाही. असे असले तरी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची डोकेदुखी नाकारता येत नाही. दरम्यान, एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार राज ठाकरे सक्तवसुली संचलनालयाच्या रडारवर असल्याची माहिती आहे. या वृत्तानुसार त्यांना लवकरच ईडीकडून समन्स बजावण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कोहिनूर मिल क्रमांक तीनच्या व्यवहारामध्ये राज यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. या व्यवहारावरून राज ईडीच्या यादीमध्ये असल्याची चर्चा आहे. राज यांचा पक्षाचा मुंबई-पुणे-नाशिक मध्ये प्रभाव आहे. या पटट्यात सत्ताधारी भाजपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर राज यांची तोफ नियंत्रित करणासाठीही प्रयत्न सूरू आहेत. दरम्यान, ईडीने कोहिनूर सीटीएनएलचे मुख्य वित्त अधिकाऱ्यांचा जबाब नोंदवला आहे. पुढील टप्पा म्हणून राज यांना समन्स बजावण्यात येणार आहे.
