नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेत नाराजी; आमदारांनीच दिला घरचा आहेर

0

मुंबई : राज्यातील नगपंचायती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे निकाल लागले. त्यात सर्वाधिक नगरपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसच्या आल्या. त्या खालोखाल भाजपानेही नगरपंचायत निवडणुकीत बाजी मारली. राज्यातील महाविकास आघाडीनं भाजपाला धक्का दिला असला तरी नगर पंचायतीच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी सत्तेतील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधातले लढले होते.

नगर पंचायतीच्या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकत्रित लढण्याची इच्छा होती. परंतु स्थानिक परिस्थितीमुळे ते शक्य झालं नाही. या निवडणुकीत सर्वाधिक २७ नगरपंचायतींवर राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलं पण भाजपानेही जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ४०० हून अधिक जागा जिंकल्या.सत्तेतील काँग्रेस राज्यात तिसऱ्या क्रमांकावर राहिली. काँग्रेसनं ३१६ जागा पटकावल्या तर मुख्यमंत्री असलेली शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेनेला २८४ जागा जिंकता आल्या.

नगर पंचायतीच्या निकालानंतर शिवसेनेत अंतर्गत नाराजी पसरली आहे. विदर्भातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आशिष जयस्वाल यांनीही पक्षाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं विधान केले आहे. जयस्वाल म्हणाले की, विदर्भात शिवसेनेला योग्य ते स्थान मिळालं नाही. पक्षाने काळजी घेणं गरजेचे आहे. आत्मचिंतन करण्याची गरज आहे. भविष्यात शिवसेनेसाठी हे धोकादायक आहे. पक्ष नेतृत्व त्यावर विचार करेल अशी आशा आहे असं त्यांनी म्हटलं.

त्याचसोबत कोकणातील शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. योगेश कदम म्हणाले की, ५ वर्ष ज्या शिवसेनेची सत्ता दापोली नगरपंचायतीवर होती ती सत्ता आता राष्ट्रवादीकडे गेली. जे शिवसेनेच्या AB फॉर्मवर निवडून आले ते शिवसैनिक नाही ते अखेरच्या क्षणी राष्ट्रवादीतून शिवसेनेत येत त्यांना फॉर्म दिले गेले. ६ पैकी ४ राष्ट्रवादीचे आहेत. पूर्णपणे शिवसेनेचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रवादीचं बळ वाढवायचं हे काम काही नेत्यांनी केले. ही छुपी निती आमच्या काही नेत्यांची होती. दापोलीत तेच झालं. शिवसेनेची सत्ता राष्ट्रवादीकडे गेली. त्यात फायदा कोणाचा झाला तर तो राष्ट्रवादीचा झाला. जे मतदान विधानसभेला शिवसेनेला झालं होतं त्यापेक्षा साडेतीनशे मतदान जास्त अपक्षांना झालं आहे असं त्यांनी म्हटलं.

तसेच आम्ही या निवडणुकीतून लांब होतो. मंडणगड येथे शिवसेनेची ताकद असताना जागा वाटपात कमी जागा दिल्या गेल्या. मंडणगडमध्ये शिवसेनेने केवळ ४ जागा घेतल्या होत्या. त्याठिकाणी ८ अपक्ष जे शिवसैनिक उभे राहिले ते निवडून आले. तिथे एकहाती सत्ता शिवसेनेची आली असती अशी खंतही आमदार योगेश कदम यांनी बोलून दाखवली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:24 PM 20-Jan-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here