मुंबई : गेल्या एक-दोन महिन्यांपासून राज्यात वाढणाऱ्या कोरोना रूग्णांच्या संख्येत सध्या काही प्रमाणात घट होत आहे. रूग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे त्याला कोरोनाची तिसरी लाट म्हटले गेले होते.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता याबाबत म्हत्वाची माहिती दिली आहे. “राज्यातील काही भागांमध्ये अजूनही रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामध्ये नाशिक, नागपूर, पुणे, औरंगाबाद अशा शहरांचा समावेश आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या ठिकाणी रूग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे राज्यात तिसऱ्या लाटेचा उच्चांक येऊन गेला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राजेश टोपे म्हणाले, ” शहरातील रूग्णांच्या संख्येत घट होत असली तरी ग्रामीण भागातही रूग्ण वाढत आहेत. परंतु, वाढणारे रूग्ण पाच ते सात दिवसांच्या उपचारानंतर बरे होत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात वाढणारी बाधितांची सख्या याबाबत सध्या चिंता करण्याची आवश्यकता नाही’
दरम्यान, रूग्ण संख्या कमी होत असल्याने राज्यात मास्क वापरण्याची आवश्यता नाही असी चर्चा सुरू आहे. परंतु, याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले, “मास्क मुक्त महाराष्ट्र असं आम्ही कधीही म्हणालो नाही. कोरोनाचा धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. त्यामुळे टास्क फोर्सने याबाबत मार्गदर्शन करावं. राज्यातील निर्बंध अजून किती दिवस ठेवायचे याविषयी मार्गदर्शन मिळालं, तर त्याविषयी लोकांनाही दिलासा मिळू शकेल. इंग्लंड, डेन्मार्क, हॉलंड अशा देशांमध्ये काही निर्णय घेतले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर आपल्याला त्यातून काही बोध घेता येईल का? या देशांतील पार्श्वभूमीवर आपल्याकडे जे नियम आहेत त्यात काही बदल करता येतील का? याविषयी आयसीएमआरकडे विचारणा करण्याची विनंती आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. त्यामुळे सध्यातरी मास्क मुक्त महाराष्ट्र यावर कोणतीही चर्चा नाही”
राजेश टोपे म्हणाले, “तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्याच्या आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी केली होती. रूग्णांसाठी बेडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, राज्यातील 92 ते 95 टक्के बेड अद्याप रिक्त आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले फक्त 5 ते 7 टक्केच रूग्ण बेडवर आहेत. आयसीयू, ऑक्सिजनवरचे रुग्ण तर केवळ एक टक्के आहेत. काही बाधित रूग्ण घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाही. परंतु, कोरोनाचे संकट अजून पूर्ण टळले नसल्याने काळजी घेण्याची गरज आहे”
पुढे बोलताना राजेश टोपे म्हणाले, सध्या नवीन व्हेरियंटची चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटना त्यावर संशोधन करत आहे. नवा व्हेरियंट जास्त घातक आहे अशी माहिती मिळत आहे. परंतु नवीन व्हेरियंटचा रुग्ण अजून कुठेच आढळला नाही. त्यामुळे जास्त काळजी करण्याची आवश्यकता नाही.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:47 PM 29-Jan-22