पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं टीका केली आहे. तसेच आदित्य ठाकरे यांचं पर्यावरण प्रेम दिखावूपणाचं आहे, असं म्हणत मनसेनं लक्ष्य केलं आहे. मुंबई महापालिकेच्या होर्डिंग लावण्यासाठी झाडाची कत्तल करण्यात आल्याचा आरोप मनसेनं केला आहे. तसेच काही झाडांना इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक आरोपही मनसेकडून करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं मुंबई महापालिका आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, झाडांची कत्तल झाल्याने मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंचं हेच पर्यावरण प्रेम आहे का? अशी टीका मनसेनं केली आहे.