रत्नागिरी : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद अंतर्गत तरूणांना विविध प्रकारची प्रशिक्षणे दिली जातात. यासाठी राज्य स्तरावर जीएसए संस्थेच्या मार्फत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू असते. ‘प्रशिक्षण घेतल्यानंतर भल्या मोठ्या पगाराच्या नोकरी मिळेल अशी स्वप्ने रंगवली होती. १०० टक्के नोकरी मिळेल अशी हमी दिली गेली. मात्र नोकरी सोडा साधे प्रमाणपत्रही मिळाले नाही. त्यामुळे वर्षही वाया गेले. आता आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही’, असा उद्विग्न सवाल जिल्हयातील १०५ तरूण-तरूणींनी केला आहे. याबाबत या तरूणांनी जि. प. अध्यक्ष रोहन बने यांच्यासमोर आपली कैफियत मांडली. दरम्यान, झालेला प्रकार हा चुकीचा आहे. याबाबत जि. प. प्रशासनाने गंभीर भूमिका घेतली आहे. संबंधित संस्थेशी संपर्क साधून योग्य ती समज देण्यात आली आहे. या संस्थेच्या विरोधात जि. प. चा ठराव करून शासनाला पाठवण्यात येणार आहे, असे जि. प. अध्यक्ष रोहन बने यांनी त्या तरूण-तरूणींनी ग्वाही दिली.