पंतप्रधान मोदी पाकिस्तानला लवकरच भेट देणार; पाक अब्जाधीशाचा दावा

0

इस्लामाबाद : पाकिस्तानचे अब्जाधीश उद्योगपती मियाँ मनशा यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधांबाबत एक मोठा दावा केला आहे. मियाँ मनशा यांच्या म्हणण्यानुसार, उभय देशांत पडद्यामागे अनेक घडामोडी आणि चर्चा सुरू आहे. भारत आणि पाकिस्तान यांनी एकत्र काम केल्यास पंतप्रधान मोदी एका महिन्यात पाकिस्तानला भेट देऊ शकतात, असा दावाही त्यांनी यावेळी केला आहे.

कोणीही कायमचा शत्रू नसतो. आम्हाला भारतासोबत संबंध सुधारण्याची गरज आहे, असं म्हणत आपण या दोन्ही देशांतील संबंधांकडे सकारात्मकदृष्टीने पाहत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.

मियाँ मनशा हे पाकिस्तानची बहुराष्ट्रीय कंपनी ‘निशात ग्रुप’चे अध्यक्ष आहेत. १९६५ च्या युद्धापूर्वी पाकिस्तानचा जवळपास ५० टक्के व्यापार भारतासोबत होत होता. आपल्याला शांततेच्या वातावरणाची आवश्यकता आहे. भारताकडे चांगलं तंत्रज्ञान आहे. आपल्याकडेही अनेक गोष्टी आहेत ज्या आपण भारताला देऊ शकतो. त्यामुळे कुणीही कायमचा शत्रू असू शकत नाही. इतकी गरिबी आहे, त्यामुळे आपल्याला भारतासोबत संबंध सुधारावेच लागतील, असं वक्तव्य एका पत्रकार परिषदेत मियाँ मनशा यांनी केलंय.

उल्लेखनीय म्हणजे, नुकत्याच जाहीर झालेल्या पहिल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात पाकिस्ताननं भारतासोबत संबंध सुधारण्यावर आणि शांतता कायम राखण्यावर भर दिला होता. त्यानंतर पाकिस्तानी बिझनेसमन मिनशा यांनी केलेला हा दावा चांगलाच चर्चेत आलाय.

नुकतंच, राष्ट्रीय सुरक्षा धोरणाशी संबंधित एका अधिकाऱ्यानं पाकिस्तानी वृत्तपत्र ‘एक्सप्रेस ट्रिब्यून’शी बोलताना, ‘आम्ही पुढील १०० वर्षांपर्यंत भारताचा द्वेष करणार नाही. नव्या सुरक्षा धोरणात शेजारी देशांसोबत शांततेवर भर देण्यात आला आहे. या मुद्द्यावर संवाद आणि प्रगती झाली तर भारतासोबतचे व्यापारी आणि व्यावसायिक संबंध पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे’, असं म्हटलं होतं.

यापूर्वी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करानं युद्धबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर एकमत व्यक्त केलं होतं. अफगाणिस्तानात तालिबान राजवट येण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पडद्याआड चर्चा सुरू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची तिसऱ्या देशात भेट झाल्याचाही दावा काही वृत्तसंस्थांनी केला होता. त्याचबरोबर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांसाठी संयुक्त अरब अमिरातनंही अनेक प्रयत्न केले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:28 AM 03-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here