नवी दिल्ली : राम मंदिर प्रकरणावर नेमलेल्या मध्यस्थ समितीला तोडगा काढण्यात अपयश आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालयीन तोडगाच काढवा लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता निकाल लागेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात ६ ऑगस्टपासून नियमित सुनावणी होणार आहे. अयोध्या प्रकरणी नेमलेल्या मध्यस्थ समितीने आपण सन्मानजनक तोडगा काढण्यात अयशस्वी ठरल्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे दिला. त्यानंतर सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी याप्रकरणी ६ ऑगस्टपासून निकाल लागेपर्यंत नियमित सुनावणी होणार असल्याचे सांगितले. ही नियमित सुनावणी आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच मंगळवार, बुधवार, गुरुवार होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे अयोध्या प्रकरणाचा निकाल दृष्टीक्षेपात असून तो लवकरात लवकर लागेल अशा भावना व्यक्त होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठासमोर आता सुनावणी होईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३० ऑगस्ट २०१० मध्ये वादग्रस्त जमिनीचे तीन विभाग करून अनुक्रमे रामलल्ला, निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात यावी असा आदेश दिला होता. या आदेशाविरोधात अनेक याचिका दाखल झाल्या आहेत. आता त्या याचिकांवर आता नियमित सुनावणी होईल.
