अहमदनगर : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत भाषणातून केलेली टीका राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना एवढीच बोचली असेल तर महाविकास आघाडी सरकारने करोना काळात केलेल्या मदतीची श्वेतपत्रिका काढावी,’ अशी मागणी भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. आपल्यावरची जबाबदारी टाळण्यासाठीच राज्यातील परप्रांतीय कामगारांना पाठवून देण्यासाठी काँग्रेस नेत्यांनी पुढाकार घेतला, ही वस्तुस्थिती असल्याचेही विखे पाटील म्हणाले.
मोदींच्या भाषणावरून सध्या वादंग सुरू आहे. यासंबंधी प्रसार माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी यांचे वक्तव्य महाराष्ट्राच्या विरोधात नाही. करोनाच्या संकटात राज्य सरकार कोणत्याही समाज घटकाला मदत करू शकले नाही. आपल्यावरची जबाबदारी टाळण्यासाठीच राज्यातील परप्रांतीय कामगारांना त्यांच्या राज्यात पाठवून देण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांनी पुढाकार घेतला, ही वस्तुस्थिती आहे. जे काँग्रेस नेते प्रधानमंत्र्यांवर टीका करीत आहेत, ते या संकटाच्या काळात फक्त मुंबईत बसून राहिले. फेसबुकवरून संवाद साधत होते. केंद्राच्या मदतीवरच अवलंबून राहिले. केंद्राने दिलेल्या मदतीचाही यांना योग्य विनीयोग करता आला नाही. रोज प्रसारमाध्यमांपुढे येऊन पोपटपंची करणाऱ्या संजय राऊत यांनी किती कोविड सेंटर उभारले?,’ असा प्रश्नही विखे पाटील यांनी उपस्थित केला.
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका करताना विखे पाटील म्हणाले, ‘महसूल मंत्री आता प्रधानमंत्र्यांवर टीका करीत आहेत, परंतु, त्यांच्या तालुक्यात एकही कोविड सेंटर सुरू होऊ शकले नाही. तेथील ४६ खासगी रुग्णालयांना परवानगी देऊन नागरिकांना वाऱ्यावर सोडण्यात आले होते. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी केंद्रावर टीका करण्याची फॅशन झाली आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:48 PM 08-Feb-22