राज्यातील ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढील अधिवेशनात नवे धोरण सादर करण्यात येणार असून ‘गाव तेथे ग्रंथालय’ सुरू करण्यात येणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी सांगितले. ते विधानसभेत याबाबत बोलत होते. राज्यातील वाचन चळवळ टिकविण्यात ग्रंथालये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. त्यामुळे राज्यातील ग्रंथालयांचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरात लवकर हालचाल करून ‘गाव तेथे ग्रंथालय’ सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन सामंत यांनी केले. राज्यातील नवीन ग्रंथालयांना मान्यता मिळण्याविषयीचा प्रश्न अनिल बाबर, अतुल भातखळकर, योगेश सागर, रोहित पवार, आशीष शेलार, प्रकाश आबिटकर, संजय सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत उत्तर देताना सामंत बोलत होते. दरम्यान, मुंबईतील ग्रंथालयांपासून या मोहिमेची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच ग्रंथालयात दृक्श्राव्य वाचनालयाचीही व्यवस्था करण्याचे विचाराधीन असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच राज्यातील ग्रंथालये डिजिटल करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.