अणुउर्जा प्रकल्प, बंदर प्रकल्प व रद्द झालेला नाणार प्रकल्प यांच्यामुळे नवी ओळख मिळालेल्या राजापूर तालुक्यावर आता महारष्ट्र औद्योगिक विकास मंडळानेही लक्ष केंद्रीत केले आहे. तालुक्यात बारसू येथे 936 हेक्टर जमिनीवर औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असून शिवसेनेसह अनेक पक्षांनी त्याचे स्वागत केले आहे.रत्नागिरी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे प्रभारी क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता परशुराम करवडे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात 936 हेक्टर क्षेत्रावर भूसंपादनाचा प्रस्ताव पुढे गेला आहे. याला मान्यता मिळाल्यानंतर याबाबतची अधिसूचना काढण्यात येईल. याठिकाणी ग्रामस्थांनी भूसंपादन करण्याकरता अनूकुलता दर्शवल्यामुळे त्यावर पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बारसू येथे भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या औद्योगिक वसाहतीची आखणी केली जाणार आहे. उद्योगांसाठी भूखंड निश्चित करून नियमांप्रमाणे त्याचे वाटप करण्यात येईल. याठिकाणी कोणत्या उद्योगांना किती जमिनी उपलब्ध करायची, याविषयी अद्याप मागणी आलेली नाही. मात्र हे क्षेत्र अधिसूचित झाल्यानंतर उद्योजकांकडून निश्चितच प्रतिसाद मिळेल असा विश्वास करवडे यांनी व्यक्त केला.
