रत्नागिरी : पर्ससीननेट मच्छीमारांच्या आंदोलनावर तोडगा काढून देण्याचे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मच्छीमार नेत्यांना दिले आहे. मच्छीमार नेत्यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन राज्य सागरी मासेमारी नियमनातील सुधारीत कायदा कसा नुकसानदायक आहे, याची माहिती दिली. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेसचेच मत्स्यव्यवसाय विकास मंत्री अस्लम शेख यांच्यासोबत मुंबईत बैठक आयोजित करतो, असे आश्वासन दिले. यावेळी उपस्थित असलेल्या माजी खासदार हुसेन दलवाई यांनीही या प्रकरणी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
रत्नागिरी दौर्यावर असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मच्छीमार नेते नासीर वाघू, हनिफ महालदार, जाविद होडेकर, इम्रान मुकादम, मजहर मुकादम, प्रतीक मोंडकर, शाहीद मिरकर आदींनी भेट घेऊन पर्ससीननेट मासेमारी संदर्भात असलेल्या व्यथा मांडल्या. सुधारीत कायदा कसा नुकसानकारक आणि अन्यायी आहे, याची माहिती मच्छीमार नेत्यांकडून देण्यात आली.
राज्य सागरी मासेमारी नियमनातील सुधारीत अन्यायी कायद्याविरोधात गेल्या दीड महिन्यापासून साखळी उपोषण सुरु आहे. परंतू शासन दरबारी याची दखलच घेतली जात नाही. काँग्रेसचेच मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांना या प्रकरणी सहाय्य करण्याच्या सूचना कराव्यात, अशी विनंती मच्छीमार नेत्यांकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई सुद्धा उपस्थित होते.
पर्ससीननेट मच्छीमारांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मत्स्यव्यवसाय विकासमंत्र्यांशी लवकरच मुंबईत बैठक लावून मार्ग काढतो, असे आश्वासन दिले. त्याचवेळी माजी खासदार दलवाई यांनी मंत्र्यांना रत्नगिरीत घेऊन येतो आणि येथील मच्छीमारांवर कसा अन्याय होतो हे दाखवून देऊया, असे आश्वासन दिले. पर्ससीननेट मच्छीमारांवर सुधारीत कायद्यामुळे कसा अन्याय होतोय आणि आर्थिक नुकसान होतेय याचे सविस्तर निवेदनही प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदारांना देण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
7:05 PM 18-Feb-22