कणकवली – नारायण राणे पुढच्या विधानसभेत जाणे गरजेचे आहे. कणकवली मतदारसंघ अधिक सुरक्षित आहे. यामुळे प्रसंगी राणेंसाठी हा मतदारसंघ सोडण्याची माझी तयारी आहे. सावंतवाडीसाठीही स्वाभिमान वेगळा विचार करत आहे; मात्र पुढच्या काळात राज्यातील राजकीय समीकरणे निश्चित झाल्यानंतर धोरण ठरवले जाईल, असे सुतोवाच आमदार नीतेश राणे यांनी आज येथे केले. राजकीय विषयावर चर्चा करताना श्री. राणे म्हणाले, “”महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेच्या बहुतांशी जागा लढण्याच्या तयारीत आहे; मात्र राज्यातील राजकीय परिस्थिती पुढच्या काही दिवसात निश्चित झाल्यानंतर स्वाभिमान पक्ष आपले उमेदवार जाहीर करेल. विधानसभेच्या कणकवली आणि कुडाळ मतदारसंघासाठी पक्षाची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे; मात्र सावंतवाडी मतदारसंघात वेगळा विचार होऊ शकतो. खासदार नारायण राणे सिंधुदुर्गात येतील तेव्हा जिल्हा कार्यकारणीमध्ये याबाबतचा खुलासा होईल. येत्या नऊ ऑगस्टला जिल्हा कार्यकारिणीची बैठक आहे. त्यानंतर राज्यातील विविध भागात स्वाभिमान पक्षातून लढणाऱ्या उमेदवारांची नावे निश्चित होऊ शकतात; मात्र राज्याची जी काही राजकीय परिस्थिती आहे, त्यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. विधानसभेसाठी शिवसेना- भाजपची युती होणार का यावरही बरेच काही निश्चित होईल.”
