रत्नागिरी : केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशन योजनेतून जिल्ह्यात एक हजारहून अधिक नळपाणी योजना होणार आहेत. त्यातील 66 योजनांच्या दुरुस्तीची तर 19 नवीन पाणी योजनांची कामांचा आरंभ झाला आहे. हर घर नल से जल या उद्देशाने केंद्र शासन ही योजना राबवित असून जिल्ह्याचा साडेचारशे कोटींचा आराखडा आहे.
कोकणात मोठ्याप्रमाणात पाऊस पडत असला तरीही दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासारखी परिस्थिती महाराष्ट्रातील अनेक भागात निर्माण होते. यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी केंद्र शासनाच्या जल जीवन मिशनमधून निधी दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्याचा आराखडा बनविण्यात आला आहे. या आराखड्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्ती आणि नवीन नळपाणी योजनांचा समावेश आहे. योजनेतील कामे युध्दपातळीवर सुरु व्हावीत यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडूनही नियोजन करण्यात आले आहे. अधिकारी, कर्मचारी कमी असतानाही अंदाजपत्रके तयार करुन निविदास्तरावर कामे आणली गेली आहेत.
जिल्ह्यात जुन्या योजनांच्या दुरुस्तीचे 599 प्रस्ताव आहेत. त्यातील 97 योजनांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. निविदांचा कालावधी ग्रामपंचायतीमार्फत ठरवण्यात आला आहे. पुढील महिन्याभरात ठेकेदार निश्चित करुन कामांना वर्कऑर्डरही दिली जाईल. 66 कामे लवकरच चालू करण्यात येणार असून त्यांना वर्कऑर्डर दिली गेली तर 66 योजनांची दुरुस्ती कामे हाती घेण्यात आली आहेत. ती पुढील दोन महिन्यात पूर्ण होतील असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. नवीन योजनांच्या आराखड्यात जिल्ह्यातील 478 कामांचा समावेश आहे. त्यामध्ये 29 योजनांची निविदा काढण्यात आलेल्या आहेत. तसचे 19 कामांच्या वर्कऑर्डर दिली गेल्या असून एकोणीस कामे चालू केली आहेत. ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घरात पाणी मिळणार आहे.
घरोघरी पाणी देणारे जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश शासनाने दिले असून त्याची जोरदारपणे अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे गेली काही वर्षे टंचाईग्रस्त असलेल्या अनेक गावे आणि वाड्यांचा जलजीवन मिशन योजनेमध्ये समावेश केला आहे. -विक्रांत जाधव, अध्यक्ष, जिल्हा परिषद
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:15 PM 21-Feb-22