रत्नागिरी एसटी विभागात उद्यापासून संपावरील काही कर्मचारी हजर होण्याची शक्यता

0

रत्नागिरी : रत्नागिरी विभागातील संपावर गेलेले काही कर्मचारी दि. २२ फेब्रुवारीपासून कामावर हजर होण्याची शक्यता आता प्रशासनानेच वर्तवली असून त्यामुळे रत्नागिरी आगारातून बसफेऱ्या या आठवड्यात वाढतील, असा विश्वासही रत्नागिरी एस.टी. प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून एस.टी. कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होणार याला एस.टी. प्रशासनाकडून वारंवार दुजोरा देण्यात येत होता. मात्र, अपेक्षित कर्मचारी कामावर हजर झालेलेच नाही, उलट हजर झालेले कर्मचारी पुन्हा संपात सहभागी झाल्याचे चित्र महिनाभरापूर्वी पाहावयास मिळाले. आता जवळपास सहाशे ते साडेसहाशे कर्मचारी कामावर हजर झालेले आहेत.

जिल्हयातील एसटी आगारांमध्ये रत्नागिरी आणि गुहागर या दोन डेपोत कर्मचारी संख्या हजर होण्याचे प्रमाण अतिशय अल्प आहे. त्यामुळे कंत्राट पध्दतीवर भरती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना या दोन डेपोत प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे या आठवड्यात एसटी वेळापत्रक सुरळीत होईल का, याकडे एसटी प्रशासन व प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

जवळपास ८० ते ८५ टक्के एसटी प्रवासी वाहतूक बंद आहे. शालेय व महाविद्यालयीन मुलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे कामगार वर्गाचेही दररोज ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मिळेल त्या वाहनांनी येण्या जाण्याचा प्रवास करावा लागत आहे. संप मार्गी लागण्याबाबत अद्यापही कोणत्याही हालचाली दिसत नाही. त्यामुळे दि. २२ फेब्रुवारीनंतर नेमके काय परिस्थिती असेल हे त्याचवेळी लक्षात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:34 PM 21-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here