रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या विषयावर राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा आयोजित केली आहे. प्रश्नमंजूषा, घोषवाक्य, गीत तयार करणे, व्हिडीओ, आणि भित्तिचित्र स्पर्धा अशा पाच प्रकारच्या स्पर्धांचा समावेश असून १५ मार्च २०२२ पर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार आहेत. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, रत्नागिरी यांनी केले आहे.
‘स्वीप’ कार्यक्रमांतर्गत स्पर्धा आयोजित करून निवडणूक आयोग जनतेच्या प्रतिभा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरण्यासाठी करण्यात येत आहे. ‘माझे मत माझे भविष्य-एका मताचे सामर्थ्य’ या मध्यवर्ती संकल्पनेवर राष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा असून प्रश्नमंजूषा स्पर्धेद्वारे निवडणुकीबाबतची जागरूकता पातळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्पर्धकांनी तपशिलवार मार्गदर्शक तत्त्वे, नियम आणि अटी यांच्या माहितीसाठी स्पर्धेचे संकेतस्थळ https://ecisveep.nic.in/contest/ येथे भेट द्यावी. प्रवेशिका सर्व तपशिलांसह voter-contest@eci.gov.in येथे ईमेल कराव्यात. ईमेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका १५ मार्च २०२२ पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशिलासह voter-contest@eci.gov.in या ईमेलवर पाठविण्यात याव्या, असे आयोगाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
स्पर्धेत प्रश्नमंजूषा स्पर्धा, घोषवाक्य (Slogan) तयार करण्याची स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्र स्पर्धा यांचा समावेश आहे. गीत स्पर्धा, व्हिडिओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तिचित्रे स्पर्धांचे संस्थात्मक, व्यावसायिक आणि हौशी अशा तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले आहे. प्रत्येक श्रेणीतील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक श्रेणीला विशेष उल्लेखनीय रोख पारितोषिके दिली जातील. संस्थात्मक श्रेणीमध्ये ४ विशेष उल्लेखनीय तर व्यावसायिक आणि हौशी श्रेणीसाठी तीन विशेष उल्लेखनीय पारितोषिके दिली जाणार आहेत.
घोषवाक्य स्पर्धेतील पहिल्या तीन विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असून सहभागी होणाऱ्या ५० स्पर्धकांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार देण्यात येणार आहे. तसेच प्रश्नमंजूषा स्पर्धा विजेत्यांना भारत निवडणूक आयोगाचे नाव असलेल्या आकर्षक वस्तू देण्यात येतील. तिसरी पातळी पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेची माहिती जिल्हयाच्या https://ratnagiri.gov.in/ या संकेतस्थळावरदेखील पाहता येईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 23-Feb-22