‘एका मंत्र्याला समर्थन देण्यासाठी सगळं मंत्रीमंडळ रस्त्यावर, पण शेतकऱ्यांची चौकशी करायला वेळ नाही’

0

कोल्हापूर : शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. गेल्या चार दिवसापासून या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कोल्हापूरमधील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे.

22 फेब्रुवारीपासून या आंदोलनाला सुरूवात झाली आहे. अद्याप महावितरण किंवा सरकारच्या वतीने कोणतेही आश्वासन दिलेले नाही. त्यामुळे आंदोलन सुरुच आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे.

गेल्या 4 दिवसापासून दिवसरात्र शेतकरी या ठिकाणी बसून आहेत. पण शेतकऱ्यांच्या जिव्हळ्याच्या प्रश्नाकडे बघायला राज्यकर्त्यांना वेळ नाही. एका मंत्र्याला अटक केली म्हणून, त्याला समर्थन देण्यासाठी सगळे मंत्रीमंडळ रस्त्यावर येते. मात्र रात्री सापाच्या मुंडक्यावर पाय देऊन उसाला पाणी देणारा शेतकरी साप चावल्यावर तडफडून मरतो. म्हणून त्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. मात्र, या आंदोलनाची चौकशी करायली ना महावितरणचे अधिकारी आले ना, राज्यातील मंत्री आले हे दुर्दैवी असल्याचे शेट्टी म्हणाले. आमच्या जीवनाचा अंत करणाऱ्या सापाला जर शेतकऱ्याकडून काही इजा झाली तर वन्य विभागाकडून आमच्यावर गुन्हा दाखल होतो. त्यामुळे साप, तसर, डुक्कर, गवा हे सगळे जंगली प्राणी आहेत. हे सगळे प्राणी सरकारचे लाडके आहेत, त्यांना सरकारचे विशेष संरक्षण आहे. खरतर त्यांनी जंगलात राहायला पाहिजे पण हे प्राणी सरकारचे लाडावलेले असल्याने रात्रीचे शेतात येतात. त्यामुळे त्यांचा अवमान न करता ताब्यात घेऊन त्या प्राण्यांना सरकारी कार्यालयात सोडा असे आवाहन राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना केले. आपल्या शेतात जर एखादा साप आढळला तर त्याला सन्मानाने सरकारी कार्यालयात सोडा असेही शेट्टी म्हणाले.

शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती करा इत्यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान, बेमुदत धरणे आंदोलनाच्या चौथ्या दिवशी आंदोलनस्थळी असणाऱ्या शेतकऱ्यांना जेवणासाठी विविध ठिकाहू डबे येत आहेत. आज वडणगे (ता. करवीर) येथील माता भगिनींनी आंदोलकांना 1 हजार भाकरी दिल्या. गावातील सर्व माता भगिनींचा मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आभारी असल्याचे राजू शेट्टी यांन सांगितले. तसेच या बेमुदत धरणे आंदोलनातील शेतकऱ्यांना घुणकी (ता. हातकंणगले) येथील प्रदीप पांडूरंग जाधव यांनी जेवणासाठी १०० किलो तांदूळ व १ डबा गोडेतेल दिले आहे.

दरम्यान, या बेमुदत धरणे आंदोलनास आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व त्यांचे पदाधिकारी यांनी भेट देऊन आम आदमी पक्षाच्यावतीने पाठिंबा दिला आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उर्जामंत्री नितीन राऊत यांचा पुतळा दहन देखील करण्यात आला. कोल्हापूरचे पालकमंत्री सते पाटील यांच्या कार्यालयासमोर या पुतळ्याचे दहन करण्यात आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:54 PM 25-Feb-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here