विरोधकांनी कितीही गोंधळ घातला तरी नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही; राष्ट्रवादीची स्पष्ट भूमिका

0

मुंबई : विरोधक कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले आहे.

३ मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष भाजपाने नवाब मलिकांचा राजीनामा घ्या अन्यथा अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा घेतला. त्यावर राष्ट्रवादीनं भूमिका स्पष्ट केली आहे.

मंत्री जयंत पाटील म्हणाले की, नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजपा करत राजीनाम्याची मागणी करत आहेत. खोटे – नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे ही भाजपची कार्यपद्धती आहे. विरोधकांना चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमीप्रमाणे आमंत्रण दिले जाईल पण ते नेहमीप्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. मात्र विरोधकांनी चहापानाला यावे. चर्चेअंती सर्व प्रश्न सुटत असतात असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत शाहरुख खान यांच्या मुलाला फसविण्यात आले हे एसआयटीच्या रिपोर्टनुसार आलेल्या माहितीवरुन स्पष्ट होते. नवाब मलिक हे याच कारवाईचा विरोध करत होते. मात्र त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. नवाब मलिक यांच्याबाबत आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. मात्र मलिकांचा राजीनामा न घेण्याची भूमिका पक्षाने घेत राष्ट्रवादी काँग्रेस नवाब मलिकांच्या मागे ठाम असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितले आहे.

दरम्यान, या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याची महाविकास आघाडीची तयारी आहे. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची आढावा बैठक पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बोलावली आहे. यामध्ये अधिवेशनातील कामकाजाबाबत चर्चा केली. संध्याकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनावर महाविकास आघाडीची चर्चा होईल अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.

हे सरकार दाऊदला समर्पित – भाजपा

मुंबईतील बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी प्रकरणात एका मंत्र्याला तुम्ही पाठिशी घालत आहात आणि विशेष म्हणजे मुंबई आमची अशी भाषा करणाऱ्या शिवसेनेनं नवाब मलिकांचा राजीनामा घेतला नाही. त्यामुळे त्यांचाही खरा चेहरा आता समोर आला आहे. हे सरकार दाऊदला समर्पित सरकार आहे”, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला टोला लगावला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:47 PM 02-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here