जैतापूर जनजीवन विस्कळीत

0

जैतापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडीकिनारी राहणार्‍या भागामध्ये  खाडीला आलेल्या उधाणाच्या भरतीचे पाणी घरामध्ये शिरल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. शनिवारी पुन्हा मोठ्या उधाणाच्या पाण्याच्या भरतीने खाडीचे पाणी भरण्याची शक्यता आहे. राजापूर तालुक्यातील जैतापूर खाडी किनारी राहणार्‍या भागामध्ये उधाणाच्या भरतीचे पाणी घराघरात शिरत आहे. जैतापूर बाजारपेठेमध्ये चंद्रकांत नवाळे, गुरुनाथ नारकर, संतोष नारकर, चेतन नारकर यांच्या घराला पाण्याने वेढा दिला आहे. श्री अ‍ॅटो, सखी ब्युटीपार्लर, रिद्धीसिद्धी ब्युटीपार्लर, समाधान हॉटेलपर्यंत या पाण्याची पातळी वाढली आहे. जैतापूर जेटी संपूर्ण पाण्याखाली गेली असून, तेथील स्वच्छतागृह पूर्ण पाण्यात आहे. पीरवाडी, साई मंदिर या भागात देखील खाडीचे पाणी शिरले आहे. सतत पडणार्‍या पावसामुळे तसेच राजापूर अर्जुना नदीच्या पाण्यामुळे भरतीच्यावेळी खाडीपात्रातील पाण्याची पातळी वाढतांना दिसत आहे. या पाण्यातूनच चारचाकी व दुचाकी वाहने मार्गक्रमण करताना दिसत आहेत. जैतापूर जेटी ते कस्टम कार्यालयपर्यंत रिटनिंग वॉल बांधून त्याला स्वयंचलीत झडपे बसविली तर बाजारपेठ भागात खाडीचे पाणी शिरणार नाही. मात्र या समस्येकडे लोकप्रतिनिधी गेली पन्नास वर्षे दुर्लक्ष करत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापनेचा जैतापूरमध्ये बोजवारा उडालेला आहे.

 
 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here