रत्नागिरी : मोसमी पाऊस सक्रिय होण्यात उशीर झाला असताना श्रावणाच्या प्रारंभीच जिल्ह्यात पावसाने गतवर्षाच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. जून आणि जुलैमध्ये सातशे ते पाचशे मि.मी. ची पिछाडीवर राहणार्या पावसाने ऑगस्टच्या सुरुवातीलाच 2571.22 मि.मी.ची सरासरी गाठली आहे. गतवर्षी याच कालवधीत पावसाने 2519. 83 मि.मी. सरासरी गाठली होती. जुलैअखेरीस जोरदार सुरुवात करणार्या पावसाचा 1 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत मुसळधार जोर कायम राहणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात सुरू होणार्या श्रावणात सरींचा राबता राहणार आहे. त्याला जोरदार वार्याची साथ लाभणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यानुसार किनारी आणि दुर्गम भागात सावधगिरी बाळगण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात जिल्ह्यात 41.56 मि.मी.च्या सरासरीने 374 मि.मी. एकूण पावसाची नोंद झाली. जुलैअखेरीस जोरदार पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले होते. जुलैअखेरीस जिल्ह्यात पावसामुळे सुमारे साडेसात कोटीची हानी झाली आहे. आता ऑगस्ट महिन्यातही पावसाचा जोर कायम राहणार आहे. आगामी तीन दिवस कोकणातील सर्व जिल्ह्यात जोरदार तर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा वेधशाळेने दिला आहे. याच दरम्यान श्रावण मासालाही सुरवात होत असल्याने श्रावण सरींचे सातत्य या कालावधीत राहणार आहे.तसेच काही भागात 120 ते 175 मि.मी. पावसाची शक्यता हवामान विभागान ेवर्तविली आहे. त्याला ताशी 90 ते 100 कि मी. वेगाने वाहणार्या वार्याची साथ लाभणार आहे. त्यामुळे या कालावधीत प्रशासनाने जिल्ह्यातील किनारी भागात आणि दुर्गम भागात सावधगीरी बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. शुक्रवारी दिवसभरात मंडणगड तालुक्यात 105 मि.मी. दापोलीत 23, खेड 60, गुहागर 6, चिपळूण 55, संगमेश्वर 52, रत्नागिरी10, लांजा 403 आणि राजापूर तालुक्यात 23 मि.मी पाऊस झाला. दरम्यान जिल्ह्यात श्रावणामध्ये जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. याच कालावधीत मासेमारीचा नवा हंगामही सुरू होणार आहे. त्यामुळे प्रशासनाने किनारी भागात आणि खोल सागरी भागात मासेमारीसाठी जाऊ नये, असे सूचित केेले आहे.
