राज्यातील रिक्त पदांसाठी मेगा भरतीची तयारी सुरू असून या मेगाभरतीला 20 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. महाविकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद करुन महाआयटी विभागाच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या भरती प्रक्रियेवर आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. ट्विट करत रोहित पवार यांनी राज्यसरकारला आवाहन केले आहे. ‘राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घालून तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करण्याचा प्रकार मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या काही अधिकाऱ्यांच्या खेळामुळे होत आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे. तसेच ‘कोणत्याही खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती न करता ‘एमपीएससी’ला सक्षम करुन त्यांच्या माध्यमातूनच पुढील नोकर भरती करावी, अशी राज्यातील तरुणांचा प्रतिनिधी म्हणून माझी व अनेक आमदारांची महाविकासआघाडी सरकारला विनंती आहे.’ असेही त्यांनी आपल्या आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
