➡ लवकरच मोहीम तीव्र करत थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करणार
रत्नागिरी येथील पालिकेच्या घरपट्टी वसुलीला पोटनिवडणुकीमुळे ब्रेक लागला आहे. मार्च महिना संपण्यास अवघे १५ दिवस शिल्लक आहेत. घरपट्टी वसुलीच्या १२ कोटी ६४ लाख उद्दिष्टांपैकी ५ कोटी १५ लाख इतकीच वसुली झाली आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे उर्वरित दिवसांमध्ये ६० टक्के वसुली करण्याचे मोठे आव्हान पालिका प्रशासनापुढे आहे. घरपट्टी वसुलीची स्थिती समाधानकारक असावी, यासाठी पालिकेच्या मालमत्ता विभागाने थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभाग क्रमांक पाचसाठी पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी मतदारयाद्या तयार करण्यात अधिकारी अडकल्याने दोन दिवस वसुली मोहीम थंडावली आहे. परंतु दोन दिवसांनंतर वसुली मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असून यासाठी जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.