“देशने हमें बहुत कुछ दिया है, हमे भी देश को कुछ देना चाहिए” : डॉ. मोहित कुमार गर्ग

0

◼️ मत्स्य शेती करून मत्स्य उत्पादन वाढवावे; डॉ मोहित कुमार गर्ग यांचे प्रतिपादन

रत्नागिरी : “मत्स्य संवर्धनातील प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थीनी मत्स्यशेती हा जोड धंदा करून रोजगाराची संधी निर्माण करून चरितार्थ चालवावा”, असे आवाहन रत्नागिरीचे पोलीस अधिक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी केले. ते भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी ने आयोजित केलेल्या तीन दिवसीय गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धनाची मुळाक्षरे व संमिश्र मत्स्यशेती या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, ‘निर्यातक्षम मत्स्यसंवर्धन करून देशाला परकीय चलन मिळवून देशाच्या आर्थिक विकासात योगदान द्यावे. देश ने हमें बहुत कुछ दिया है, हमे भी देश को कुछ देना चाहिए. देशाचे ऋण फेडण्याची संधी यानिमित्ताने सर्व प्रशिक्षणार्थीना मिळाली आहे, ती त्यांनी साधून घ्यावी” असे भावनिक आवाहन त्यांनी प्रशिक्षणार्थीना केले. प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी। व्यासपीठावर मत्स्य महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे, मत्स्य संवर्धन विभाग प्रमुख डॉ. सुरेश नाईक, मत्स्य अर्थशास्त्र आणि विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. केतन चौधरी उपस्थित होते.

मत्स्य महाविद्यालय कौशल्यभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम नेहमीच राबवित असते, त्यातून स्वयंरोजगार निर्मितीसाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रशिक्षणार्थीना दिले जाते. भविष्यात मत्स्य महाविद्यालयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेतलेले अनेक उद्योजक निर्माण होतील असा आशावाद सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश शिनगारे यांनी व्यक्त केला व त्याकरीता मत्स्य महाविद्यालय सर्वोतोपरी तांत्रिक मार्गदर्शनासाठी कटीबध्द असेल, अशी ग्वाही दिली.

कार्यक्रमाचे आयोजक विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. केतन चौधरी यांनी समारोप समारंभाच्या प्रास्ताविकात निशुल्क प्रशिक्षणाचा लाभ हा आपल्या कुटूंबाला उदरनिर्वाहाचं साधन निर्माण करण्यासाठी केला तर या प्रशिक्षण कार्यक्रमाचा हेतू साध्य झाला असे मानता येईल असे सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाने संयुक्त पणे राबवविलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेवून स्वत:ची आणि देशाची प्रगती करावी असे आवाहन केले.

या प्रशिक्षण कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याच्या विविध भागातून ५० प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. राष्ट्रीय मत्स्यकी विकास मंडळ, हैदराबाद ने प्रायोजित केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमात सर्व प्रशिक्षणार्थीना सकाळची न्याहारी, दुपारचे भोजन, सायंकाळचा चहा व येण्या-जाण्याचा किमान खर्च देण्यात आला.

या प्रशिक्षणात गोड्या पाण्यातील माशांची ओळख, बीजाची निवड, तलाव बांधणी, पाणी व्यवस्थापन, खाद्य व्यवस्थापन, पीक काढणी, विक्री व्यवस्थापन, शासकीय योजना, प्रकल्प अहवाल याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली, तसेच प्रक्षेत्र भेटीव्दारे प्रात्यक्षिक अनुभव देण्यात आला.

प्रशिक्षणार्थीनी संपूर्ण तांत्रिक कार्यक्रमाच्या नियोजन आणि उत्कृष्ट आयोजनासाठी मत्स्य महाविद्यालय शिरगाव रत्नागिरी चे आभार मानले. शेवटी सर्व प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुहास वासावे यांनी तर आभार श्री. भालचंद्र नाईक यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भालचंद्र नाईक, डॉ भरत यादव, डॉ. संदेश पाटील, श्री. सुशील कांबळे, श्री.वैभव येवले तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रतिक यादव, शिवम बोरीवले, शिवम पवार, गौरवी वणकर, मृणाल नासरे, तृष्णा बिस्वाल, धिरज पालवे, प्राजक्ता चहांदे, दामिनी अखंड यांनी विशेष परिश्रम घेतले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:33 PM 18-Mar-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here