‘चला हवा येऊ द्या’ वादाच्या भोवऱ्यात; साबळेनी माफी मागावी

0

झी मराठीवरील चला हवा येऊ द्या हा विनोदी कार्यक्रम घराघरात पोहोचला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे ही नावे आता प्रत्येकाच्या परिचयाची झाली आहेत. त्यामुळे, या कार्यक्रमातील प्रत्येक एपिसोडला आवर्जुन पाहिलं जातं. या कार्यक्रमातून मराठी आणि हिंदी चित्रपटांचे प्रमोशन करण्यात येते. मात्र, नुकतेच सुबोध भावे आणि दिग्दर्शक सुभाष घई यांच्या उपस्थितीत ‘विजेता’ चित्रपटासंदर्भात केलेल्या खास शोमुळे ही चला हवा होऊ द्या टीम अडचणीत येण्याची शक्यता आहे. चला हवा येऊ द्या.. च्या मंचावर बुधवार 11 मार्च 2020 रोजी झालेल्या कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांची विटंबना झाल्याची भावना छत्रपती शाहू महारांजांप्रती आदर व्यक्त करणाऱ्या शाहूप्रेमींनी केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चला हवा येऊ द्या..च्या त्या एपिसोडवर आक्षेप घेत, हा छत्रपती शाहू महाराजांचा अपमान असल्याचं नेटीझन्सने म्हटले आहे. तसेच, त्या पार्श्वभूमीवर चला हवा येऊ द्या… आणि डॉ. निलेश साबळे यांचा निषेधही करण्यात आला आहे. चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील एका शोमध्ये छत्रपती शाहू महाराज आणि सयाजीराजे गायकवाड यांच्या प्रतिमेत भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे नेटीझन्स आणि शाहू महाराजांना मानणारे अनुयायी संताप व्यक्त करत आहेत. या एका भागामध्ये राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांचा फोटो मॉर्फ करून या मालिकेतील अभिनेत्यांच्या रुपात वापरण्यात आला आहे. यावरूनच खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले असून त्यांनी इशारा दिला आहे. ‘लोकप्रियतेची हवा डोक्यात घुसली, की माणूस विक्षिप्त वागायला सुरू करतो. ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रतिमेचा चुकीच्या पद्ध्तीने वापर केला गेला आहे. हे आक्षेपार्ह तर आहेच, परंतु निषेधार्ह सुद्धा आहे. निलेश साबळे तसेच झी वाहिनी ने या गैरकृत्याची जबाबदारी घेऊन जाहीर माफी मागावी. अन्यथा वाहिनी व दिग्दर्शक यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’ असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे. ‘आमचे घराणे हे कलेचे आश्रयदाते आहे. स्वतः शाहू महाराजांनी कोल्हापूरला कलानगरीमध्ये रूपांतरित केले होते. सयाजीराव गायकवाडांचे योगदानही काही कमी नाही. कलेसाठी स्वातंत्र्याची आणि पोषक वातावरणाची गरज असते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण काहीही करावं. आम्हा सर्व इतिहास प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’ अशा शब्दांमध्ये संभाजीराजे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here