चिपळूणमधील ढाकमोली येथील देवळाचा माळ परिसरात वणवा लागून हजारो आंबा कलमे आगीत जळून खाक झाली आहेत. ही आग हनुमंत सखाराम लाड, दर्शना हनुमंत लाड व मयुरी महेश लाड यांनी लावल्याचा संशय व्यक्त होत असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये उदय दत्ताराम लाड (३८, रा. ढाकमोली सहाणवाडी) यांचे १५ लाखांहून अधिकचे नुकसान झाले आहे. या बाबत उदय लाड यांनी सावर्डे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.११मार्च रोजी रात्री वणवा लागल्याची घटना घडली. लाड कुटुंबीयांमध्ये जमिनीचे वाद आहेत. त्यातून हा प्रकार
घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या बाबत उदय लाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, उदय लाड यांची ढाकमोली देवळाचा माळ येथे सर्व्हे नं. १९३६ व सातांबाचा माळ येथे सर्व्हे नं. १९५३ या ठिकाणी आंबा बाग आहे. या आंबा बागेलगतच संशयित आरोपींचे घर व जमीन आहे. या दोन कुटुंबांमध्ये गेले अनेक दिवस जमिनीवरून वाद सुरू आहे. त्यामुळे संशयितांनी आंब्याच्या बागेला आग लावून सुमारे एक हजार आंब्याची झाडे जळून खाक झाली आहेत. यामध्ये उदय लाड यांचे पंधरा लाखांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. नुकसान करण्याच्या हेतूने ही आग लावली असावी असा आरोप उदय लाड यांनी केला आहे.