पणन मंडळाचा आंबा महोत्सव आजपासून

0

पुणे : राज्य कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक विक्री योजनेंतर्गत चालूवर्षीच्या आंबा महोत्सवास शुक्रवारपासून (दि. १) सुरुवात होत आहे, अशी माहिती मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

कोकणातील हापूस आंब्यांसह केशर आंबा उत्पादक शेतकरीही महोत्सवात सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्राहकांच्या सोईसाठी मार्केट यार्डातील प्रवेशद्वार क्रमांक ९ येथील पीएमटी बस डेपोसमोरील वखार महामंडळाच्या मोकळ्या जागेत आंबा महोत्सव सुरू करण्यात येत आहे. पणन मंडळाकडे बहुतांशी हापूस व केशर आंबा उत्पादकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामध्ये सुमारे ५१ स्टॉल आंबा उत्पादकांना उपलब्ध करून दिले आहेत. महोत्सवाचा कालावधी १ एप्रिल ते ३१ मेअखेर राहणार आहे.

विक्री व्यवस्थेमधील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव व ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळावा या उद्देशाने आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. रत्नागिरी, सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील हापूस आंबा उत्पादकांचा सहभाग पुण्यातील महोत्सवात राहील.

तसेच हंगामानुसार पुढे केशर आंबा उत्पादकही सहभागी होणार आहेत. दरम्यान, गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर जास्तीत जास्त पुणेकरांनी आंबा महोत्सवास भेट देऊन थेट आंबा उत्पादकांनी उपलब्ध केलेल्या आंब्यांची खरेदी करण्याचे आवाहन मंडळाचे सरव्यवस्थापक दीपक शिदे यांनी केले आहे.

राज्यभर आंबा महोत्सव भरविणार : कोरोना महामारीमुळे गतवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन करता आले नाही. तथापि, चालूवर्षी राज्यभर आंबा महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना सहकार व पणन मंत्री तसेच पणन मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील यांनी दिल्या आहेत. पणन राज्यमंत्री व मंडळाचे उपाध्यक्ष शंभुराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यापासून आंबा महोत्सवास सुरुवात करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:23 AM 01-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here