तुम्हाला महाराष्ट्रात गृहमंत्रीपद दिलं तर..?; संजय राऊत स्मितहास्य करत म्हणाले…

0

मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राष्ट्रवादीकडे असणारं गृहमंत्रिपद शिवसेनेला दिलं जाणार का, अशीही चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना एक सूचक वक्तव्य केलं आहे.

‘तुम्हाला राज्याच्या राजकारणात आणून गृहमंत्रिपद दिलं तर ते स्वीकारणार का?’ असा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना राऊत यांनी गृहमंत्रिपद स्वीकारण्यास थेट नकार न देता स्मितहास्य करत म्हटलं की मी राज्याच्याच राजकारणात आहे. राऊत यांनी दिलेल्या या प्रतिक्रियेनंतर नवा संभ्रम तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे.

गृहमंत्रिपदाबाबतची चर्चा आणि मुख्यमंत्र्यांसोबतची भेट

केंद्रीय तपास यंत्रणांकडून महाविकास आघाडीतील नेत्यांभोवती कारवाईचा फास आवळला जात असताना राज्याचं गृहखातं मात्र प्रभावीपणे काम करत नसल्याची चर्चा सत्ताधारी नेत्यांमध्येच सुरू झाली होती. खासदार संजय राऊत यांनीही आज सकाळी यावर भाष्य करत गृहखातं जर सावध पाऊल टाकून काम करत असेल तर ते स्वत:च्या गळ्याभोवती फास तयार करत आहे, त्यामुळे गृहमंत्र्यांनी आणखी आक्रमपणे काम करायला हवं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत खातेबदल होणार असल्याची शक्यता व्यक्त वर्तवण्यात येत होती. मात्र गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि गृहखात्याच्या कारभाराबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर गृहखात्यात कोणताही बदल होणार नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर संजय राऊतांनीही घेतला यू-टर्न

संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना गृहखात्याच्या कामाबाबत काहीशी नाराजी व्यक्त केली होती. मात्र दुपारी मुख्यमंत्र्यांनी आपण मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांवर खूश असल्याचं सांगताच संजय राऊत यांचाही सूर बदलला आहे. ‘या क्षणी सरकारच्या रचनेत फार बदल होईल, असं मला वाटत नाही. आतापर्यंतच्या परंपरेनुसार मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असतं. परंतु हे एकहाती सरकार नसल्याने ते शक्य नाही. हे तीन पक्षांचं सरकार आहे, त्यामुळे प्रत्येक पक्षाकडे वेगवेगळी जबाबदारी आहे,’ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:13 PM 01-Apr-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here