येस बँकेवरील निर्बंध येत्या तीन दिवसात दूर केले जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाने दिली आहे. येत्या 19 मार्चपासून येस बँकेच्या सर्व सेवा पूर्वीप्रमाणे सुरु होणार आहेत. त्यामुळे एस बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थमंत्रालयाने बँकवर असलेला 3 एप्रिल पर्यंतचा मोराटोरियम 18 मार्चला हटवण्यात येईल असं आधीच स्पष्ट केलं आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, येस बँकेतील पैसे सुरक्षित आहेत, वेळ पडल्यास RBI आर्थिक मदत करेल, अशी हमी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शाक्तिकांत दास यांनी दिली आहे. करोनामुळे अर्थव्यवस्थेवर होणारे परिणाम पाहता मदतीचे सर्व पर्याय खुले असल्याचे त्यांनी सांगितले. येत्या बुधवारपासून येस बँकेवरील निर्बंध दूर होणार असून ती पूर्वीप्रमाणे काम करणार आहे. भारतीय बँकिंग व्यवस्था मजबूत आहेत. येस बँकेतील खातेदारांचे पैसे सुरक्षित आहेत. येस बँकेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरु आहेत. बँकेला कोणतीही आर्थिक चणचण भासल्यास रिझर्व्ह बँक मदतीसाठी पुढाकार घेईल,अशी हमी दास यांनी दिली. ते म्हणाले, की येस बँक प्रकरणानंतर काही राज्य सरकारांनी खासगी बँकांमधून ठेवी काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र देशातील बँका सुरक्षित आणि मजबूत आहेत. यात खासगी बँकांही आहेत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने या सरकारांना पत्र पाठवली आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.