रत्नागिरी : हिंदू संस्कृती मानवजातीला प्रेम व विश्वशांतीचा संदेश देणारी आहे. ती प्रभूरामचंद्राच्या वचनाप्रमाणे चालणारी आहे. श्री रामचंद्राच्या आशीर्वादाने सत्यकथन व सर्वांचे कल्याण करणारे कार्य प्रत्येकाच्या हातून घडू दे, असे आवाहन नाणीज पीठाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांनी शनिवारी येथे केले.
गुढीपाडव्यानिमित्त नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान व श्री संप्रदायातर्फे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याची सांगता येथील श्रीराम मंदिरात झाली. त्यावेळी ऑनलाईन झालेल्या प्रवचनात ते बोलत होते.
प्रारंभी त्यांनी सर्वांना हिंदू नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. रत्नागिरीचे श्रीराम मंदिर तमाम लोकांचे श्रद्धास्थान आहे. तो ऐतिहासिक वारसा आहे. येथे आल्यावर खूप प्रसन्न वाटते. वर्षभर येथे आपल्या हिंदू संस्कृतीचा जागर करणारे अनेक कार्यक्रम होत असतात. हीच परंपरा व संस्कृती जतन करण्याचा संकल्प प्रत्येक हिंदू बंधूभगिनीने करावा, ही प्रभूचरणी प्रार्थना. प.पू. कानिफनाथ महाराज यांच्या प्रवचनाला चांगला प्रतिसाद मिळाला.