आरवली : संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे ग्रामपंचायत ते सरंद या दोन कि.मी. रस्त्याची चाळण झाली आहे. अनेकवेळा पत्रव्यवहार होऊनही या रस्त्याच्या दुरवस्थेकडे जिल्हा परिषदेने लक्ष दिले नसल्याचे चित्र आहे.
आंबव-पोंक्षे ते सरंद या रस्त्याचे २००९ ला डांबरीकरण झाले होते. पुढच्या काही वर्षातच या रस्त्याची चाळण झाली होती. १३ वर्षे झाली तरी याकडे कोणतेही लक्ष जिल्हा परिषदेने दिले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. हा रस्ता जिल्हा परिषदेच्या मालकीचा आहे. जिल्हा परिषदेने या रस्त्याची तत्काळ डागडुजी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. दोन कि.मी.च्या या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सर्वत्र खडी विखुरली गेली आहे. या रस्त्यावरून दुचाकी चालवणे जिकिरीचे झाले आहे. याच रस्त्यावरून गावातील मुले पायी अथवा सायकलने माखजन हायस्कूलला जातात. त्या विद्यार्थ्यांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यातून वाहने चालवल्यामुळे वाहनांच्या दुरुस्ती खर्चात वाढ होत आहे.