‘कोरोना हे जागतिक संकट असून त्यावर आपण मात निश्चित करु’, असा विश्वास व्यक्त करत खबरदारीच्या पार्श्वभूमीवर घरातून बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘राज्य सरकारने दिलेल्या सूचनांचं पालन करण्याची आवश्यकता आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर पुढचे १५ दिवस महत्त्वाचे आहेत, योग्य काळजी घ्या, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. तसेच ‘राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढणे ही चिंतेची बाब असली तरी घाबरुन जाण्याची गरज नाही. राज्यावर अजूनही संपूर्ण शट डाऊनची वेळ आलेली नाही. आगामी पंधरा दिवस महत्त्वाचे असून, योग्य काळजी घ्या, असं देखील ते म्हणाले. दरम्यान, ‘राज्यातील सर्व परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, निवडणुका सुद्धा पुढे ढकलण्यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनंती केली आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.