रत्नागिरी : रत्नागिरीतील नावाजलेली सामाजिक संस्था जाणीव फाउंडेशनने अल्पावधीतच अत्यावश्यक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. संस्था आता दशकपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. यावेळी जाणीव संस्थेने अंध विद्यालयाच्या मदतीसाठी येत्या २६ एप्रिल रोजी तिमिरातुनी तेजाकडे हा श्रवणीय कार्यक्रम आयोजित केला आहे. सुमारे सहा वर्षांपूर्वी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता.
रत्नागिरी जिल्ह्यात घराडी (ता. मंडणगड) येथे एकमेव स्नेहज्योती निवासी अंध विद्यालय आहे. त्या विद्यालयाचे विद्यार्थी ‘तिमिरातुनी तेजाकडे’ कार्यक्रम सादर करतात. अध्यक्षा निवृत्त शिक्षिका आशाताई कामत आणि प्रतिभा सेनगुप्ता या दोन भगिनींनी वेगळी वाट निवडून प्रतिकूल परिस्थितीत अनेक समस्यांवर मात करत अंध मुलांसाठी अंध शाळेची स्थापना केली. भारतरत्न सचिन तेंडुलकर, सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि अनेक मान्यवरांनी स्वत: भेट देऊन या संस्थेचा गौरव केला आहे.
उत्तम जैन, डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्यासारख्या निःस्वार्थी आणि सामाजिक भान जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वांनी आज स्नेहज्योतीची वाटचाल बळकट केली आहे. या शाळेतील मुलांनी गायन, वादन कौशल्याने कार्यक्रम तयार केला आहे. दोन तासांच्या जादूई संगीत मैफिलीनंतर येणारा प्रत्येक प्रेक्षक अतिशय तृप्त मनाने बाहेर येतो.
हाच कार्यक्रम २६ एप्रिल रोजी होणार असून प्रसिद्ध गायिका बालश्री पुरस्कारप्राप्त मनश्री सोमण उपस्थित राहणार आहे. हा कार्यक्रम २६ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नागिरीत स्वा. सावरकर नाट्यगृहात होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका सिद्धाई फुड्स-आरोग्य मंदिर, हॉटेल वैशाली- बाजारपेठ, श्रावणी ग्राफिक्स-आरोग्य मंदिर, हॉटेल व्हेज ट्रीट- काँग्रेस भवन आदी ठिकाणी उपलब्ध आहेत. या कार्यक्रमातून उपलब्ध होणारा निधी स्नेहज्योती अंध विद्यालयास देणगी स्वरूपात देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जाणीवचे अध्यक्ष महेश गर्दे (९४२२००३१२८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:35 PM 18-Apr-22